जळगाव (प्रतिनिधी): शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर वेगाने पसरत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नसून इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. भीतीपोटी इंधनाचा साठा करणे किंवा मोठ्या प्रमाणात खरेदी करणे टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अफवा पसरविणे किंवा चुकीची माहिती प्रसारित करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घर्ग यांनी नागरिकांना शांतता, संयम आणि सहकार्य राखण्याचे आवाहन करत, सर्वांच्या सहकार्याने कोणतीही अनुचित परिस्थिती निर्माण होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.










