करमाळा (प्रतिनिधी): येथील भूमी अभिलेख कार्यालय येथील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे आज संपूर्ण कार्यालयीन कामकाज ठप्प झाले. वीज नसल्याने संगणकीय सेवा बंद पडल्या असून 7/12 उतारे, नकाशे तसेच इतर महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत.
दररोजप्रमाणे आजही शेकडो मालमत्ता धारक व शेतकरी आपल्या कामांसाठी कार्यालयात आले होते. मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अनेक नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, तर काहींना काम न होता परत जावे लागले.
या घटनेमुळे विशेषतः शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाने तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, वीज खंडित होण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. संबंधित विभागाकडून लवकरच वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.









