श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी): राज्यातील वृत्तपत्र उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून त्याच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम, तालुका शाखा माहूर यांच्या वतीने राज्य सरकारकडे निवेदन सादर करण्यात आले.
दि. २५ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून हे निवेदन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांच्यामार्फत पाठविण्यात आले. निवेदनात वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याचे नमूद करत वाढत्या खर्चामुळे हा उद्योग अडचणीत सापडल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, सन २०१९ पासून कागद, मुद्रण साहित्य, वीज व इतर खर्चामध्ये सुमारे १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्यानुसार शासकीय जाहिरात दरात वाढ करण्यात आलेली नसल्याने विशेषतः लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
यावेळी संघटनेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
- शासकीय जाहिरात दरात किमान १५०% वाढ करावी
- ई-टेंडर व शासकीय जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध कराव्यात
- जाहिरातींसाठी किमान १०० चौ. से. आकार निश्चित करावा
- जाहिरात देयके ३० दिवसांत अदा करून विलंब झाल्यास व्याज द्यावे
- लघु व मध्यम वृत्तपत्रांना जाहिरात वाटपात समान संधी द्यावी
- सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फत देण्याची सक्ती करावी
- प्रलंबित देयके तात्काळ अदा करावीत
- १० वर्ष सेवा असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती व २० वर्ष सेवा व ५५ वर्ष वय पूर्ण झालेल्यांना पेन्शन लागू करावी
वृत्तपत्र उद्योग मजबूत राहिल्यासच जनतेच्या माहितीच्या अधिकाराचे संरक्षण होऊ शकते, त्यामुळे शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर व्हॉईस ऑफ मीडिया, माहूरचे तालुकाध्यक्ष इलियास बावाणी, जिल्हा उपाध्यक्ष विजय आमले, तालुका सरचिटणीस संजय बनसोडे, फिरोज पठाण, गजानन कुलकर्णी, सचिन बेहेरे, सय्यद किरमाणी आदी पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.











