दापोली | २५ मार्च (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारावर झालेल्या हल्ल्याने पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत यांच्यावर बहादूर शेख नाका परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडींचे वृत्तांकन करत असताना ही मारहाण झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच दापोली तालुक्यातील पत्रकार एकत्र येत या भ्याड कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला. “कर्तव्य बजावताना पत्रकारांवर हल्ले होत असतील, तर ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे,” अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी व्यक्त केली.
याप्रकरणी दापोलीतील पत्रकारांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले. हल्लेखोरांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर विविध माध्यम प्रतिनिधींनी सह्या करत एकजूट दर्शवली. “दोषींना त्वरित अटक झाली नाही, तर अशा घटना वाढण्याची भीती आहे,” असा स्पष्ट इशारा पत्रकारांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये अस्वस्थता पसरली असून, नागरिकांकडूनही दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











