जालना (प्रतिनिधी)
जाफ्राबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे सरकारी रस्ता अडवल्याच्या प्रकरणावरून वाद निर्माण झाला असून, संबंधित सरपंच व ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील पूर्वनियोजित जागेवर यापूर्वी अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी हस्तक्षेप करून अतिक्रमण थांबवले होते.
मात्र, त्याचाच राग मनात धरून सरपंच व ग्रामसेवकांनी कैलास गिरी यांच्या मदतीने डॉ. आंबेडकर जयंतीच्या पारंपरिक मिरवणुकीसाठी असलेला सरकारी रस्ता अडवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा रस्ता तात्काळ मोकळा करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा संघटक राजेंद्र खरात यांच्यासह शत्रुघ्न कोळी, विजय सावंत, बबन सावंत, योगेश हिवाळे, रोहन हिवाळे, राजू दाभाडे, कडुबा हिवाळे, संजय हिवाळे, भगवान घोरपडे, विलास सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.










