मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. अनियमित हवामान बदलामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विशेष मदत पॅकेज जाहीर केले.
या पॅकेजनुसार, पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹४२,०००, तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना ₹२२,००० इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
कोकणातील आंबा आणि काजू पिकांना यंदा तापमानातील चढ-उतार, अवेळी पाऊस, गारपीट आणि वाऱ्यामुळे मोठा फटका बसला आहे. फळधारणेत झालेल्या घटेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, १७ मार्च २०२६ रोजी कोकणातील लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर कृषी विभाग तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला असून त्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
नुकसानाचा आढावा:
- कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर क्षेत्र
- यापैकी ८०,४१८ शेतकऱ्यांनी विमा घेतला
- सुमारे १५५ महसूल मंडळांमध्ये नुकसानभरपाई देय
आंबा पिकासाठी:
- कमी तापमानामुळे: ₹६,०७१ ते ₹३४,००० प्रति हेक्टर
- जास्त तापमानामुळे: ₹१७,१७१ ते ₹६८,००० प्रति हेक्टर
- विमा संरक्षित रक्कम: ₹२.२७ लाख प्रति हेक्टर
काजू पिकासाठी:
- क्षेत्र: १,७५,१४० हेक्टर
- नुकसानग्रस्त मंडळे: सुमारे १५०
- नुकसानभरपाई: ₹१६,८०० ते ₹४२,००० प्रति हेक्टर
- विमा संरक्षित रक्कम: ₹१.६० लाख प्रति हेक्टर
महत्त्वाचे म्हणजे, पीक विमा न घेतलेल्या शेतकऱ्यांनाही शासन मदत करणार आहे. यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम अहवालानंतर शेतकऱ्यांना त्वरित मदत वितरित केली जाणार आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या या पावलाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.










