यावल (प्रतिनिधी) फिरोज तडवी यावल तालुक्यात
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. १८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी
हिंगोणा येथे उत्साहात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी श्री. बबनजी काकडे (फैजपूर उपविभाग) तसेच तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर (ता. यावल) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका स्तरावरील अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला. जिवंत सातबारा वाटपांतर्गत 119 वारस नोंदींपैकी 13 प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. तसेच 12 उत्पन्न दाखले, 9 शिधापत्रिका, 11 जात प्रमाणपत्रे देण्यात आली.
तुकडा शेरा कमी करण्याच्या मोहिमेत एकूण 1324 प्रकरणांपैकी 1103 प्रकरणे पात्र ठरवून 11 प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. याशिवाय अधिवास व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रे (08), विशेष अर्थसाहाय योजनेंतर्गत 112 लाभार्थी, लक्ष्मी मुक्ती सातबारा (03) व आदिवासी खातेदार नोंदी (04) देण्यात आल्या.
घरकुल योजनेअंतर्गत 25 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागामार्फत 21 आयुष्मान कार्ड तसेच 21 बेबी किटचे वाटप करण्यात आले. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी 2 ट्रॅक्टरचेही वाटप करण्यात आले.
या शिबिरामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.











