जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरातील करगळ वस्ती येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक ढोल-ताशा, सनई-बँडच्या निनादात देवाची सजवलेली पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मानकरी यांच्या हस्ते देवाला हळद लावून श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा विधिवत संपन्न झाला. यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
पुढे पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवाचा छबिना काढण्यात आला. देवाच्या घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या उत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली.
यावेळी मानकरी दगडू शिंगाडे यांनी सांगितले की, देवावरील श्रद्धेमुळे भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून दादा महाराज करगळ यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी भाविकांना भक्तिमार्ग दाखवला असून भविष्यातही ते अशीच सेवा करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उत्सवादरम्यान पारंपरिक पद्धतीने भाकीतही वर्तविण्यात आले. पावसाचे प्रमाण, नक्षत्रानुसार शेतीचे नियोजन आणि शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, ज्यावर शेतकरी बांधवांचा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
देवस्थानचे प्रमुख दादा महाराज करगळ यांनी सांगितले की, मानकरी आणि भाविकांच्या सहकार्यामुळे हा उत्सव दरवर्षी यशस्वीपणे पार पडतो. विविध भागातून येणाऱ्या भाविकांमुळे या तीर्थक्षेत्राचा विकास झाला असून भाविकांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व मानकरी व भाविकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला मानकरी दगडू शिंगाडे, नाना तरडे, बापू बुरुंगले, लाला हटकर, पोपट दवाण, राऊस जमदाडे, हनुमंत जमदाडे, कैलास रसाळ, संतोष कुमार राऊत, शिवाजी लटपटे, बाळासाहेब वीर, खेडू तांबे, मल्हारी तांबे, महादेव तांबे, अमोल कोकरे, तेजस तांबे, नाना मोरे, मधु लांडे, धुळा तांबे, तात्या तनपुरे, सुरज तांबे, नानासाहेब तांबे, बाबासाहेब करगळ, गोदाजी तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.






