खालापूर (प्रतिनिधी) – खोपोली शहरातील शास्त्रीनगर येथे नागरी सामाजिक विकास संस्था (रजि) रायगड यांच्या वतीने ४ मे ते १६ मे २०२६ दरम्यान १२ दिवसीय बालसंस्कार वर्ग प्रशिक्षणाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. वर्षा राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली होत असून, बालसंस्कार शिक्षक वर्गाच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. परीक्षेनंतरच्या मे महिन्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी हा उपक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
या प्रशिक्षणामध्ये मुलांना लहान वयातच महापुरुषांचे विचार, त्यांचे कार्य, प्राणायाम, विविध मनोरंजनात्मक खेळ, नृत्य स्पर्धा तसेच शैक्षणिक दृष्टिकोनातून अनेक उपयुक्त उपक्रम शिकवले जात आहेत. मुलांमध्ये चांगले संस्कार, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जडणघडण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सौ. वर्षा मोरे यांनी सांगितले की, “बालसंस्कार हे मुलांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लहान वयातच योग्य संस्कार रुजवले तर त्याचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि शिक्षणात निश्चितच होतो.”
या वर्गाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पालक आणि मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन देत या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमात बालसंस्कार शिक्षक वर्गाने विशेष मेहनत घेत विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले. त्यामुळे मुलांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि सत्कार्याची प्रेरणा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.
या उपक्रमामुळे पालकांमध्येही समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.






