धुळे (प्रतिनिधी) – सुशी नाला, लाला सरदार नगर, मदनी नगर आणि विटाभट्टी परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या भागातील घरांच्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
महापालिका आणि सिंचन विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या पाडकाम मोहिमेला औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती देत, रहिवाशांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
सिंचन विभागाने २१ एप्रिल २०२६ रोजी नोटीस बजावत सुशी नाला परिसरातील अतिक्रमणे हटवण्याचे निर्देश दिले होते. या कारवाईला आव्हान देत मुश्ताक बेग जहूर बेग व इतर ८१ नागरिकांनी रिट याचिका (क्र. ५०७८/२०२६) दाखल केली होती.
या याचिकेवर ५ मे रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दुपारी साडेतीनच्या सुमारास पाडकाम थांबवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात अॅड. जनार्दन मुरकुटे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या आदेशाची लेखी माहिती दिली आहे.
दरम्यान, सकाळी मोठ्या फौजफाट्यासह प्रशासनाची कारवाई सुरू झाली होती, मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ती थांबवण्यात आली. त्यामुळे रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.








