बीड | प्रतिनिधी
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी त्यांना काल लातूर येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
भूसंपादन प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. तपास यंत्रणांनी न्यायालयासमोर मांडलेल्या मुद्द्यांचा विचार करून न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
या कोठडीदरम्यान अविनाश पाठक यांच्याकडून महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भूसंपादन प्रक्रियेत कोणकोण सहभागी होते, निधी वाटपात काही गैरप्रकार झाले का, तसेच इतर आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे बीड जिल्ह्यासह प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









