तीन बसफेऱ्या बंद झाल्याने संतप्त प्रवासी रस्त्यावर; तहसील कार्यालयासमोर आंदोलन
भडगाव | प्रतिनिधी
भडगाव ते वाडे मुक्कामे बस मार्गावरील तीन बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवासी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. बसफेऱ्या तात्काळ पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या उपोषणाचा पहिला दिवस आज पार पडला.
उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या फलकावर “भडगाव ते वाडे मुक्कामे बसच्या तीन फेऱ्या बंद – बसफेऱ्या तात्काळ सुरू करण्याची मागणी, प्रवाशांचे आमरण उपोषण” असा उल्लेख करण्यात आला असून ग्रामीण भागातील नागरिकांचा तीव्र संताप यावेळी पाहायला मिळाला.
उपोषणकर्ते पत्रकार अशोक परदेशी, दिव्यांग प्रहार संघटनेचे जिल्हा सल्लागार राजेंद्र परदेशी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, वाडे व परिसरातील अनेक गावांतील नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शेतकरी, मजूर तसेच नोकरदार वर्गासाठी ही बससेवा अत्यंत महत्त्वाची होती. मात्र अचानक तीन बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने दैनंदिन प्रवास विस्कळीत झाला आहे.
विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने आर्थिक भार वाढल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
उपोषणकर्त्यांनी पूर्वीप्रमाणे सर्व सहा बसफेऱ्या सुरू करण्याची ठाम मागणी केली असून, बससेवा नियमित न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा कमी करणे म्हणजे सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांवर घाला घालण्यासारखे असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. संबंधित परिवहन प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, आमरण उपोषणाच्या पहिल्याच दिवशी विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. आता प्रशासन या आंदोलनावर काय भूमिका घेते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.











