धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “सरकारची भूमिका शेतकरी हिताची नसून ती केवळ विमा कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी (कंपनी धार्जिणी) आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
याबाबत अधिक बोलताना आ. पाटील म्हणाले की, विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे आणि सरकारच्या डोळेझाक करण्याच्या वृत्तीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पीक विमा भरपाई मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत आधार देण्याऐवजी सरकार विमा कंपन्यांना पाठीशी घालत असल्याने बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे.
विमा कंपन्यांनी जाचक अटी आणि निकष लावून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. सरकारने तत्काळ यात लक्ष घालून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची विम्याची रक्कम मिळवून द्यावी, बळीराजाला न्याय न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार कैलास पाटील यांनी दिला आहे.







