अंदरसुल / प्रतिनिधी :
येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ता येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच संगीतमय तुलसी रामायण कार्यक्रमाचा आज भक्तिमय वातावरणात समारोप करण्यात आला.
समारोपाच्या दिवशी सकाळी शनिदेवाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या स्वागतासाठी भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली. यानंतर महाराजांचे कीर्तन पार पडले.
कीर्तनात महाराजांनी संत तुकाराम महाराजांचा अभंग —
“विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥”
हा अभंग निवडून त्यावर सखोल निरूपण केले.
रामगिरीजी महाराज म्हणाले की, जो परमात्मा संपूर्ण विश्वाचा निर्माता आहे, तोच भक्तांच्या प्रेमापोटी माता यशोदेला “आई” म्हणतो. ही भगवंताच्या भक्तवत्सलतेची सर्वोच्च लीला आहे. देव भक्तांच्या प्रेमामुळे स्वतःला त्यांच्या अधीन करून घेतो. भक्त ज्या भावनेने भगवंताची भक्ती करतो, त्याच भावनेने परमेश्वरही भक्तावर प्रेम करतो.
महाराजांनी पुढे सांगितले की, परमात्मा निष्काम आणि अलिप्त असला तरी गोपिकांवर त्याने प्रेमाचा असा लळा लावला की त्या सर्वस्व विसरून श्रीकृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. हे प्रेम भौतिक नसून पूर्णपणे आध्यात्मिक आहे. म्हणूनच भगवंताचे प्रेम माणसाला ईश्वराशी जोडते.
संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून निर्गुण आणि सगुण भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जे निराकार, अव्यक्त ब्रह्म आहे तेच भक्तांच्या प्रेमासाठी सुंदर सगुण रूप धारण करून पृथ्वीवर अवतरते, असे महाराजांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमासाठी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









