चुंचा | प्रतिनिधी
चुंचा गावात महावितरणच्या वीज पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावात रात्रीच्या वेळी वारंवार वीज खंडित होत असून अनेकदा रात्रभर वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित लाईनमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला जात नाही. तसेच महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर “पाच मिनिटांत वीजपुरवठा सुरळीत होईल” असे सांगितले जाते, मात्र त्यानंतरही समस्या कायम राहते. काही वेळाने संबंधित मोबाईल क्रमांकही बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतकरी आणि व्यावसायिकांच्या कामांवरही याचा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
चुंचा गावातील वीजपुरवठ्याची समस्या तातडीने सोडवून दोष दूर करावेत, संबंधित कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद द्यावा आणि नियमित व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महावितरण प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.










