आजरा | प्रतिनिधी
गेल्या तब्बल १२ वर्षांपासून तांत्रिक अडचणी आणि स्थानिक स्तरावरील विविध समस्यांमुळे रखडलेली मालिग्रे–आजरा ३३ केव्ही वीजवाहिनी अखेर कार्यान्वित करण्यात महावितरणला यश आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न तसेच अन्याय निवारण समिती व स्थानिक नगरसेवकांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे.
सदर वीजवाहिनी सुमारे १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक त्रुटी तसेच शेतकरी व ग्राहकांच्या तक्रारींमुळे ती प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नव्हती. परिणामी, मोठी पायाभूत सुविधा उभारूनही तिचा लाभ नागरिकांना मिळत नव्हता.
या समस्येकडे अन्याय निवारण समिती आणि नगरसेवकांनी महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या निवेदनाची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार प्रशासनाने प्रत्यक्ष कृती करत वीजवाहिनी कार्यान्वित केली.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता संजय कृष्णा पोवार, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरकट्टी, सहाय्यक अभियंता कृष्णा कोळी, लाईनमन संतोष डोंगरे, बाळकृष्ण कडुकर तसेच आजरा विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात आले आणि आवश्यक तांत्रिक दुरुस्त्या पूर्ण करून वाहिनी चार्ज करण्यात आली.
तीन उपकेंद्रांना मोठा लाभ
मालिग्रे–आजरा ३३ केव्ही वीजवाहिनी सुरू झाल्यामुळे खालील उपकेंद्रांच्या वीजपुरवठ्यात सुधारणा होणार आहे :
- आजरा उपकेंद्र
- गवसे उपकेंद्र
- आंबोली उपकेंद्र
या उपकेंद्रांअंतर्गत येणाऱ्या हजारो ग्राहकांना, शेतकऱ्यांना आणि नागरिकांना अधिक दर्जेदार, स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा मिळणार आहे. वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेच्या समस्येतही मोठी घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागरिकांकडून समाधान
१२ वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागल्याने आजरा, गवसे आणि आंबोली परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच अन्याय निवारण समितीच्या सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.







