लातूर | प्रतिनिधी :
उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी रविवारी लातूर येथे मतदारांशी संवाद साधला. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही आमदार रमेश कराड यांनी यावेळी दिली.
लातूर येथील ‘प्रयाग’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत बसवराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रारंभी रमेश कराड यांच्या हस्ते बसवराज पाटील आणि अभिमन्यू पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना रमेश कराड यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांबरोबरच इतर मतदारांनाही सोबत घेऊन बसवराज पाटील यांना लातूर ग्रामीण मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बसवराज पाटील यांचा विजय महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.
बसवराज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा निर्धार व्यक्त केला. मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उपस्थित मतदारांशी त्यांनी थेट संवाद साधला.
बैठकीस भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती शिवकन्या गोडभरले, जिल्हा परिषद सदस्य महादेव साळुंके, छायाबाई चिंचोलकर, पंचायत समिती सभापती मोनिका सूर्यवंशी, उपसभापती शरद दरेकर, अभिषेक अकनगिरे, खैरुनिसा आत्तार, दत्ता सरवदे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
