शहादा | प्रतिनिधी
शहादा नगरपरिषद हद्दीतील विविध सार्वजनिक व खुल्या जागांवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता शाकाहारी, मांसाहारी नाश्ता, जेवण व इतर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विक्रेत्यांकडून अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयुर अनिल बाविस्कर यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) यांना लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील अनेक ठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ विकले जात असून धूळ, प्रदूषण, माश्या आणि कीटकांमुळे अन्न दूषित होण्याचा धोका वाढला आहे.
तसेच, अनेक विक्रेत्यांकडे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत आवश्यक असलेला एफएसएसएआय (FSSAI) परवाना किंवा नोंदणी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी नगरपरिषदेची आवश्यक परवानगी न घेता व्यवसाय सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अस्वच्छ वातावरणात तयार व विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमुळे नागरिकांना पोटाचे विकार, अन्न विषबाधा आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवून सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या परवान्यांची, स्वच्छतेच्या निकषांची आणि नियमांचे पालन होत आहे का याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच नियमबाह्य पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य आयुक्त, जिल्हाधिकारी नंदुरबार, उपविभागीय अधिकारी शहादा आणि मुख्याधिकारी, शहादा नगरपरिषद यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
