शहादा | प्रतिनिधी
कोरोना काळात बंद करण्यात आलेली शहादा-धुळवद-शहादा मुक्कामी एस.टी. बस सेवा अद्याप सुरू न झाल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही महत्त्वाची बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी प्रतिनिधी जगदीशभाई रघुनाथभाई पटेल आणि परिसरातील ग्रामस्थांनी शहादा आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सुमारे २५ वर्षांपासून शहादा आगारातून शहादा-धुळवद ही बस नियमितपणे धावत होती. या बसमुळे महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील निझर, वेलदा, मुबारकपूर, वांका चार रस्ता, सरवाळा, देवाळा, पिपलोद आणि व्यावल यांसह अनेक गावांतील नागरिकांना शहादा येथे ये-जा करण्याची सोय उपलब्ध होती.
मात्र, कोरोना महामारीच्या काळात ही बस सेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर ती अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांना दैनंदिन कामांसाठी तसेच शासकीय, शैक्षणिक आणि व्यापारी कारणांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहादा हे या परिसरातील प्रमुख व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र असल्याने अनेक नागरिक दिवसभराची कामे पूर्ण करून या मुक्कामी बसने घरी परतत असत. बस सेवा बंद झाल्यानंतर प्रवाशांना खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असून त्यामुळे आर्थिक भार वाढला आहे.
या संदर्भात प्रवाशांनी अनेक वेळा शहादा आगार प्रशासनाकडे तोंडी व लेखी पाठपुरावा केला आहे. तसेच आमदार राजेश पाडवी यांनीही बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत शिफारस पत्र दिले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या मार्गावर पूर्वी मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असल्याने एस.टी. महामंडळालाही चांगले उत्पन्न मिळत होते. त्यामुळे बस सेवा सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होण्याबरोबरच महामंडळाच्या महसुलातही वाढ होईल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
एस.टी. महामंडळाच्या “बहुजन सुखाय, बहुजन हिताय” या ब्रीदवाक्यानुसार सीमावर्ती भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन शहादा-धुळवद मुक्कामी बस सेवा तात्काळ सुरू करावी, अशी आग्रही मागणी जगदीशभाई पटेल आणि परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आता याबाबत शहादा आगार प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
