परळी | प्रतिनिधी
देशातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम केल्यास संविधानाची खरी ताकद जनतेसमोर दिसून येईल, असे प्रतिपादन भारतीय दलित पँथरचे परळी तालुकाध्यक्ष माणिकराव बनसोडे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात बनसोडे यांनी सांगितले की, संविधानिक संस्थांनी भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे. कर्तव्यच्युती करणाऱ्या किंवा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई व्हावी. देशात सध्या पेपरफुटी प्रकरणे, गॅस, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती यांसारख्या समस्यांमुळे सामान्य जनता त्रस्त आहे. मात्र या प्रश्नांवर अनेक लोकप्रतिनिधी मौन बाळगत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कामगार, शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक संकटात सापडले असून महागाई कमी झाल्याशिवाय सर्वसामान्यांना दिलासा मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. निवडणुका जवळ आल्या कीच जनतेची आठवण येते, अशी टीका करत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
यावेळी त्यांनी संविधानाबाबतही आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “दोष संविधानाचा नसतो, तर ते चालवणाऱ्यांच्या नीयत आणि कार्यपद्धतीचा असतो. जेव्हा तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी संविधानाच्या चौकटीत राहून निर्भीडपणे काम करतात, तेव्हा संविधानाची खरी ताकद दिसून येते.”
सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळयुक्त अन्नपदार्थ, दूध भेसळ, गुटखा तसेच विविध नियमबाह्य व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांचा आदर्श घेऊन निर्भीडपणे कर्तव्य बजावावे तसेच विविध क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन माणिकराव बनसोडे यांनी केले आहे.
