कुरुंदवाड | प्रतिनिधी :
पंचगंगा नदीतील औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नावरून कुरुंदवाडमध्ये सोमवारी आंदोलनाला तीव्र वळण लागले. आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. अधिकारी आणि आंदोलक यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संघटनेचे प्रमुख धनाजी चूडमुंगे यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे.
कुरुंदवाड नगरपरिषदेच्या समोरील चौकात सकाळपासून आंदोलनकर्ते एकत्र जमले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा संबंधित विभागाचे अधिकारी चर्चेसाठी येतील, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली होती. मात्र जवळपास दोन तास प्रतीक्षा करूनही अधिकारी न आल्याने आंदोलकांनी इचलकरंजी कृष्णा पाणी योजनेच्या मजरेवाडी येथील केंद्राला टाळे ठोकण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
मोर्चा रवाना होण्यापूर्वीच पोलिसांनी प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संताप उसळला. काही आंदोलक पोलीस व्हॅनसमोर आडवे झोपले, तर काहींनी दुचाकी आणि दगड रस्त्यावर टाकून मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमकींमुळे पालिका चौक आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, शिवाजीराव गायकवाड, कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि संतोष माने यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर कुरुंदवाड पोलीस ठाण्यात तहसीलदार अनिलकुमार हेळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील तसेच आंदोलन अंकुश संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. संघटनेचे नेते अंकुश पाटील आणि धनाजी चूडमुंगे यांनी प्रक्रिया केलेले पाणी सोडण्यासाठी उपलब्ध शेतीचा तपशील जाहीर करावा, संबंधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करूनच पाणी सोडावे, शेती उपलब्ध नसल्यास प्रक्रिया केंद्र सुरू करू नये तसेच काळ्या ओढ्याकडे पाणी वळविण्यासाठी उभारलेला बांध तातडीने बंद करावा, अशा मागण्या मांडल्या.
मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आली नसल्याने बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आंदोलकांनी पुन्हा पालिका चौकात ठिय्या आंदोलन सुरू करत प्राणांतिक उपोषणाची घोषणा केली.
पंचगंगा नदीत औद्योगिक प्रक्रिया केलेले रासायनिक सांडपाणी सोडून पर्यावरणाचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेने केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इचलकरंजी महापालिकेकडून प्रभावी कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे.
दरम्यान, कुरुंदवाड शहराला आंदोलनामुळे अक्षरशः छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

