मळद (दौंड) : प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील मळद येथील तलाठी मानसी मोहटकर यांच्या विरोधात एका शेतकऱ्याने गंभीर आरोप करत दौंड तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. पदाचा गैरवापर करून नियमांना बगल देत एका शेतकऱ्याचे नाव परस्पर सातबाऱ्यावरून कमी केल्याचा आरोप करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय?
मळद येथील शेतकरी संतोष कुदळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तलाठी मानसी मोहटकर यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी १५५ दुरुस्तीच्या नावाखाली कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता कुदळे यांचे नाव मूळ हक्कातून कमी केले. ही बाब लक्षात आल्यानंतर कुदळे यांनी तलाठी कार्यालयात धाव घेतली असता, “झालेली चूक दुरुस्त करून देते,” असे आश्वासन देण्यात आले.
मात्र, गेल्या चार वर्षांपासून तलाठी कार्यालय, सर्कल कार्यालय आणि तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
लाचखोरीचाही संशय व्यक्त
संतोष कुदळे यांनी आपल्या निवेदनात संबंधित फेरफार प्रक्रियेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मूळ हक्कातील बदल करताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे काही पुरावेही त्यांनी तहसीलदारांकडे सादर केल्याचे सांगितले आहे.
कारवाईची मागणी
या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित तलाठ्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संतोष कुदळे यांनी केली आहे.
दरम्यान, शासकीय कामकाजात पारदर्शकतेचे दावे केले जात असताना अशा प्रकारच्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. आता या तक्रारीवर तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

