प्रतिनिधी | कणकवली
कणकवली शहराच्या ग्रामीण भागातील बहुप्रतीक्षित ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या उद्यानाच्या कामाचा शुभारंभ नुकताच उत्साहात पार पडला. नगरपंचायतीला मंजूर झालेल्या १ कोटी रुपयांच्या निधीतून हे उद्यान उभारले जाणार असून, उद्यानाचे भूमिपूजन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी आमदार राजन तेली, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक तसेच मुख्याधिकारी गौरी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवलीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही दिली. शहरातील १४ विकासकामांच्या वर्क ऑर्डर लवकरच काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस ‘जनता दरबार’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
माजी आमदार राजन तेली यांनी ग्रामीण भागातील या उपक्रमाचे कौतुक करत नागरिकांच्या मागणीनुसार शहराची नवीन आरक्षणे डोंगराळ भागात नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरासाठी सुसज्ज सुलभ शौचालय मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘नमो उद्यान’ उपक्रमांतर्गत या उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, हे उद्यान भविष्यात शहरासाठी रोल मॉडेल ठरेल.
उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी स्वच्छ आणि सुंदर कणकवली घडवण्यासाठी ग्रामस्थांनी विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, लुकेश कांबळे, राकेश राणे, बाळू पारकर, नगरसेविका दीपिका जाधव, जाई मुरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह अनेक मान्यवर, नगरपंचायतीचे कर्मचारी, पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


