जिल्हा आणि राज्याच्या विकासाला चालना देणारी महत्त्वपूर्ण मोहीम
प्रतिनिधी : वर्धा
विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला गती देण्यासाठी राज्यात प्रथमच जिल्हानिहाय श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे सर्वेक्षण राबविण्यात येत असून, वर्धा जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दोन्ही सर्वेक्षणांच्या माहिती पत्रकांचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाला वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, हिंगणघाटच्या नगराध्यक्ष डॉ. नयना तुळकसकर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त मुरलीनाथ वाडेकर, सहाय्यक नियोजन अधिकारी राधाकृष्ण चव्हाण तसेच मुख्याधिकारी विजय देशमुख उपस्थित होते.
श्रमशक्ती सर्वेक्षणाद्वारे विविध क्षेत्रांतील रोजगार स्थितीचा अचूक आढावा घेतला जाणार आहे. या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रमांना दिशा मिळण्यासोबतच रोजगार निर्मितीच्या प्रभावी योजना आखणे, आर्थिक व सामाजिक विकासाचे नियोजन करणे आणि श्रम बल सहभाग दर, कामगार लोकसंख्या गुणोत्तर तसेच बेरोजगारी दर यांसारख्या महत्त्वाच्या निर्देशांकांची मोजणी करणे शक्य होणार आहे.
यासोबतच असंघटित बिगर कृषी उद्योगांचे सर्वेक्षण देखील करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून लहान उत्पादक, व्यापारी, सेवा प्रदाते, वाहतूक, शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील आर्थिक आणि कार्यात्मक माहिती संकलित केली जाणार आहे. उद्योगांचे स्वरूप, आकार, कार्यपद्धती, संसाधने, उत्पादन, सेवा वितरण, खर्च आणि उत्पन्न यांचा सविस्तर अभ्यास या माध्यमातून होणार आहे.
या सर्वेक्षणामुळे जिल्ह्यातील असंघटित क्षेत्राची अचूक माहिती उपलब्ध होऊन भविष्यातील योजना आणि धोरणात्मक नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
हे सर्वेक्षण मार्च २०२७ पर्यंत सुरू राहणार असून, जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत महास्ट्राईड प्रकल्पांतर्गत ते राबविण्यात येत आहे.
सर्वेक्षणासाठी निवडलेल्या कुटुंबांकडून माहिती संकलित करण्यात येणार असून, ती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी या मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
