देवळी येथे पालकमंत्र्यांच्या जनसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्राप्त तक्रारींवर महिनाभरात कारवाई करण्याचे निर्देश
प्रतिनिधी : वर्धा
केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींची जबाबदारी असून, देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्वीकारल्याशिवाय येथून हलणार नाही, तसेच मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या ऐकून घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले. “इतकी वर्षे काम करूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक समस्या घेऊन प्रशासनासमोर येत असतील, तर ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, तसेच आज प्राप्त झालेली सर्व निवेदने एका महिन्याच्या आत निकाली काढावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पात्र नागरिकांना पट्टे वाटप करावे – आ. राजेश बकाने
आमदार राजेश बकाने यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. ग्रामीण भागातील रस्ते, पांदण रस्ते, अतिक्रमण नियमन आणि झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील प्रलंबित प्रश्न लवकर सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
२०११ पूर्वीच्या पुराव्यांसह पात्र असलेल्या नागरिकांना पुढील दोन महिन्यांत पट्टे देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
पालकमंत्र्यांचा नागरिकांशी आत्मीय संवाद
जनसंवाद कार्यक्रमात २४ शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित निवेदने व तक्रारी थेट पालकमंत्र्यांकडे सादर केल्या. पालकमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना कालमर्यादेत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
विविध योजनांच्या लाभांचे वाटप
कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व लाभांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये :
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील १६ लाभार्थ्यांना मदत
- १२ जणांना नवीन शिधापत्रिका
- १४८ लाभार्थ्यांना अतिक्रमण नियमानुकूल पट्टे
- ५० जणांना घरकुलाच्या चाव्या
- कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत ५ लाभार्थ्यांना तूर वाटप
- २ जणांना पॅक हाऊस अनुदान
- १० लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड वितरण
यावेळी नागरिकांनी जनसंवाद कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
