नगरपरिषद व भूमी अभिलेख विभागाची संयुक्त बैठक
महिनाभरात भूखंडधारकांना भोगवटदार वर्ग-1 पत्रके देण्याचे निर्देश
वर्धा, दि. १३ (जिमाका):
वर्धा शहरातील रामनगर परिसरातील लिजधारकांचे भूखंड शासनाने फ्री-होल्ड केल्यानंतरही अनेक नागरिकांना अद्याप मालकी हक्काची मालमत्ता पत्रके मिळाली नसल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री Dr. Pankaj Bhoyar यांनी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत नगरपरिषद, महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी वर्धा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, मुख्याधिकारी विजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, भूमी अभिलेख उपअधीक्षक सुनील बन तसेच रामनगर येथील फ्री-होल्डधारक नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, रामनगर परिसरातील अनेक नागरिक अनेक वर्षांपासून लिज जमिनीवर वास्तव्यास आहेत. या नागरिकांना कायमस्वरूपी मालकी हक्क मिळावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर शासनाने संबंधित भूखंड फ्री-होल्ड करण्याचा निर्णय घेतला असून नगरपरिषदेकडून त्यासंदर्भातील आदेशही जारी करण्यात आले आहेत.
फ्री-होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता नागरिकांना मालकी हक्काची मालमत्ता पत्रके मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने येत्या एका महिन्यात सुमारे ३५० भूखंडधारकांना भोगवटदार वर्ग-1 चे मालमत्ता पत्रके वितरीत करावीत, तसेच उर्वरित प्रकरणे पुढील दोन महिन्यांत निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी रामनगर परिसरातील नागरिकांच्या विविध अडचणी तत्काळ सोडवण्याच्या सूचनाही नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आल्या. नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर गती मिळाल्याने रामनगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
