प्रतिनिधी | वर्धा
“प्रशासनाची शेतकरी सहाय्यक धोरणे, समाजाचा पाठिंबा आणि कुटुंबाचे सहकार्य यामुळे शेतकरी आत्महत्या कमी होऊ शकतात,” असे प्रतिपादन Shankarbaba Papalkar यांनी केले. ते वर्धा सोशल फोरमच्या वतीने आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निशुल्क बी-बियाणे वाटप तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार २०२६ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
या वेळी त्यांनी शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा म्हणून गोपालन आणि बकरी पालनाचा अवलंब करावा, असेही आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद वर्धाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे या होत्या. त्यांनी वर्धा सोशल फोरमच्या उपक्रमाचे कौतुक करत पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन केले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या वैशाली शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी, यांनी शेतकऱ्यांना घन कपाशी लागवड तसेच पेरणीबाबत मार्गदर्शन करत “यंदा पेरणीची घाई करू नये,” असा सल्ला दिला.
यावेळी व्यासपीठावर वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे आणि सचिव अविनाश सातव उपस्थित होते.
कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. सौ. मनीषाताई मेघे यांनी मानपत्राचे वाचन केले. तसेच पद्मश्री पापळकर यांच्या अनाथालयातील अंध विद्यार्थिनी कु. गांधारी हिने आपल्या सुरेल आवाजात गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिचा विशेष सत्कारही यावेळी करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार महिलांना क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. चेतना सवाई, श्रीमती तबस्सुम आझमी, कु. कांचन रघटाटे आणि सौ. अश्विनी रवी काळे यांचा समावेश होता.
वर्धा सोशल फोरमकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष असून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने यावेळी शेतकरी कुटुंबांना निशुल्क बी-बियाणे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवीभाऊ शेंडे, शैलेंद्रजी तप्तरी, चंदूभाऊ ठक्कर, सुनीलजी तापडिया यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. तसेच शिव प्रतिष्ठानच्या सदस्यांनीही विशेष योगदान दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी पुरोहित यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. श्यामभाऊ परसोडकर यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
