प्रतिनिधी | वर्धा
वर्धा जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचे पालन व्हावे आणि मद्यधुंद वाहनचालकांवर आळा बसावा यासाठी वर्धा पोलिसांकडून विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोन दुचाकी चालकांवर कारवाई करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक Saurabh Kumar Agrawal आणि अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दि. १४ जून २०२६ रोजी वर्धा शहरातील इतवारा चौक परिसरात मार्शल पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी हिरो स्प्लेंडर (क्रमांक MH 32 AB 0238) या दुचाकीची तपासणी केली. चालक जितेंद्र दादाराव पालेकर (वय ५०, रा. चंद्रपूर, सध्या सिध्दार्थ सावंगी मेघे, वर्धा) हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. वाहतूक नियंत्रण शाखेत ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली असता त्याच्या शरीरात ३५.२ mg अल्कोहोल आढळून आले. त्याच्यावर मोटार वाहन कायदा कलम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दि. १५ जून २०२६ रोजी पुन्हा विशेष नाकाबंदी दरम्यान ग्लॅमर (क्रमांक MH 32 AU 0109) या दुचाकी चालकाची तपासणी करण्यात आली. अमरदीप नागोराव हातमोडे (वय ४०, रा. पालोती, ता. जि. वर्धा) हा चालकही मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे आढळले. त्याच्या शरीरात ३९.३ mg अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. त्याच्यावरही मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
दोन्ही चालकांचे वाहन परवाने जप्त करून त्यांचे लायसन्स निलंबनासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेच्या माहितीनुसार, सन २०२६ मध्ये आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राइव्हच्या १५५ कारवाया करण्यात आल्या असून ५३ लायसन्स निलंबन प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर १६२४ कारवाया तर अवैध प्रवासी वाहतुकीच्या ९७ प्रकरणांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहन चालविताना मद्यपान टाळावे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे तसेच चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावावा, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी नागरिकांना केले आहे.
