जामखेड प्रतिनिधी :
दि. १५ जून २०२६ रोजी जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या २१ विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली असून लेझीम व झांज पथकाच्या गजरात संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सारोळा गावाचे सरपंच अजयदादा काशिद, कृषी अधिकारी बाळासाहेब बोराडे, राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख, ग्रामसेवक निलेश टेकाळे, मकरंद आबा काशिद, ग्रामपंचायत सदस्य किरण मुळे, बापू तांबे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, माता-पालक, ग्रामस्थ तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे “पहिले पाऊल” ठसे घेऊन विशेष स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखन साहित्य किट, बिस्कीट पुडे, गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सरपंच अजयदादा काशिद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा आत्मविश्वास वाढवला तसेच नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश मुळे यांच्या वतीने ४० लेखन साहित्य किट तर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे यांच्या वतीने २०० बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने लापशी आणि सांबर-भाताची स्वादिष्ट मेजवानी देण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
