पारनेर | प्रतिनिधी
देवीभोयरे गावचे विद्यमान सरपंच अशोकराव मुळे यांना गावात राबविण्यात आलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या विकासकामांबद्दल “आदर्श सरपंच” पुरस्काराने गौरविण्यात आले. अहिल्यानगर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री Radhakrishna Vikhe Patil यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच एम. पी. बिर्ला समूहाकडूनही त्यांना “आदर्श सरपंच” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारामुळे तालुक्यासह जिल्हाभरातून अशोकराव मुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून देवीभोयरे गावाची मान उंचावली गेली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईकर मंडळाच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला.
यावेळी आदर्श सरपंच अशोकराव मुळे यांचा सत्कार उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्त्व अंबु भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सरपंच विठ्ठल शेठ सरडे यांचा सत्कार मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ बेलोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ बेलोटे यांनी आपल्या मनोगतात देवीभोयरे गावाच्या विकासकामांचे कौतुक केले. गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा, ऐतिहासिक अंबिकामाता प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प, गजराज शिल्प, सुसज्ज स्मशानभूमी तसेच गावांतर्गत रस्ते ही कामे गावाची वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सुभाषराव बेलोटे, सरपंच जयवंत मुळे, उद्योजक अजित शेठ चंगेडिया, किशोर शेठ डागा, अंबु शेठ भंडारी, बाळासाहेब बेलोटे, रमेश महाराज खोडदे, सावकार शेठ नरोडे, भास्कर भाऊ बेलोटे, नामदेव चौधरी, शंकरराव चौधरी, संतोष कालघुगे, पत्रकार विनोद साळवे, उपसरपंच दत्तात्रय मुळे यांच्यासह मुंबईकर मंडळातील सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा संस्थेचे संचालक मंगेश मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळासाहेब बेलोटे यांनी मानले.
सत्काराला उत्तर देताना अशोकराव मुळे यांनी देवीभोयरे गावाच्या जडणघडणीत मुंबईकर मंडळाचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत गावाच्या विकासासाठी मंडळाचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार काढले.
