श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मा. श्री. बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाने आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील तब्बल ४९ विद्यार्थिनींची पुण्यातील नामांकित औषधनिर्मिती कंपन्यांमध्ये निवड झाली असून, ही संस्था व विद्यार्थ्यांसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे.
महाविद्यालयातील २७ विद्यार्थिनींची एजिओ फार्मा, भोसरी (पुणे) येथे तर २२ विद्यार्थिनींची एमक्योर फार्मास्युटिकल्स, पुणे येथे मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
परिक्रमा फॅकल्टी ऑफ फार्मसी महाविद्यालयाने शिक्षणाचा उच्च दर्जा, सुसज्ज वसतिगृह, आधुनिक सुविधा आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे महाराष्ट्रभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत.
विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण मेहनत, आत्मविश्वास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. संस्थेच्या दर्जेदार शिक्षणपद्धतीमुळे आणि व्यावसायिक प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना थेट नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ॲड. प्रतापसिंह पाचपुते हे विद्यार्थ्यांना अधिकाधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. उत्कृष्ट लॅब, डिजिटल क्लासरूम, सुसज्ज मैदान आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने वाढ होत आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. सोनल सोलंकी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
