अकोला जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी ची सत्ता असून, प्रत्येक गावात आरोग्य केंद्र सुरू करण्याचे महत्त्वपूर्ण काम पक्षाने केले आहे. आता हाच ‘अकोला पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला असल्याची माहिती पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली.
ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील कितीही छोटे गाव, पाडे किंवा तांडा असो, तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता राहणार आहे.”
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ग्रामीण विकास हा प्रमुख मुद्दा असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्ष विशेष लक्ष केंद्रित करणार असून, शेतमालाला हमीभाव मिळवून देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि शेतकरीहिताचे धोरण जिल्हा परिषद स्तरावर राबविणे, यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील आरोग्य, शेती आणि मूलभूत सुविधा यावर भर देत पक्ष राज्यभर जनतेपर्यंत पोहोचणार असल्याचेही सुजात आंबेडकर यांनी नमूद केले.
