सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी बुधवारी जिल्ह्यात अत्यंत उत्साहपूर्ण आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत तब्बल ९९.६८ टक्के मतदान केले आहे.
जिल्ह्यातील एकूण ६१६ मतदारांपैकी ६१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर केवळ दोन मतदार मतदानापासून दूर राहिले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ६ पैकी ५ मतदान केंद्रांवर शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.
केंद्रनिहाय मतदानाचा तपशील
| मतदान केंद्र | एकूण मतदार | झालेले मतदान | टक्केवारी |
|---|---|---|---|
| उत्तर सोलापूर | १८८ | १८६ | ९८.९४% |
| कुर्डूवाडी | ८० | ८० | १००% |
| दक्षिण सोलापूर | ८९ | ८९ | १००% |
| पंढरपूर | १०० | १०० | १००% |
| मंगळवेढा | ६२ | ६२ | १००% |
| अकलूज | ९७ | ९७ | १००% |
| एकूण | ६१६ | ६१४ | ९९.६८% |
या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत रंगली आहे.
राजकीय वर्तुळात ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित नसून सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणूनही पाहिली जात आहे.
कागदावरील संख्याबळ पाहता महायुतीचे पारडे जड मानले जात असले तरी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केलेल्या मोर्चेबांधणीमुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख काही राजकीय चमत्कार घडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२२ जूनच्या मतमोजणीकडे उत्सुकता
मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले असून आता सर्वांचे लक्ष २२ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. भाजपचे राजेंद्र राऊत अपेक्षेप्रमाणे विजय मिळवणार की वसंतराव देशमुख धक्कादायक निकाल देणार, याची उत्सुकता सोलापूरसह राज्यभरातील राजकीय वर्तुळात वाढली आहे.
