रायगड | प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात सध्या ऐन जून महिन्यातही तीव्र उष्णतेची लाट कायम असून सामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही कडक उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दि. १९ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत दुपारच्या सत्राऐवजी सकाळच्या सत्रात शाळा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या संदर्भातील आदेश रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी तसेच संबंधित शासकीय विभागांना देण्यात आले असून त्याची ऑनलाईन प्रसिद्धीही करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तलाठी सजा तसेच इतर संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विशेषतः लहान मुलांना दुपारच्या कडक उन्हाचा त्रास होऊ नये, उष्माघातासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळावे आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यासोबतच नागरिकांनीही दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे तसेच उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या आदेशाची माहिती विविध वृत्तवाहिन्या आणि प्रसारमाध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत असून, रायगड जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयाचे पालक व नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

