शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व रात्रीचे भारनियमन रद्द करण्याची मागणी
श्रीगोंदा | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव फाटा येथे आज सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी” तसेच “महावितरण कंपनीने रात्री ६ ते ९ या वेळेत सुरू केलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ रद्द करावे” या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलकांनी रस्ता रोखून धरला.
या आंदोलनामुळे कोळगाव फाटा परिसरातील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता नायब तहसीलदार मिलिंद जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी निवेदन स्वीकारत मागण्या वरिष्ठ पातळीवर तातडीने पोहोचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असताना रात्री ६ ते ९ या महत्त्वाच्या वेळेत अतिरिक्त लोडशेडिंग करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यामुळे साप, विंचू आणि इतर वन्य प्राण्यांचा धोका वाढत असून शेतकऱ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
“दिवसा हक्काची वीज मिळाली पाहिजे आणि अन्यायकारक भारनियमन तात्काळ बंद केले पाहिजे,” अशी मागणी आंदोलकांनी केली.
तसेच, अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना शासन केवळ घोषणाबाजी करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केला.
या आंदोलनात तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. निवेदनावर राजेंद्र म्हस्के, हेमंत नलगे, अनिल घनवट, हरिदास शिर्के, राजेंद्र नागवडे, शामराव नागवडे, श्रीनिवास नाईक, भाऊसाहेब नेटके आदींच्या सह्या आहेत.
“मागण्या मान्य न झाल्यास यापुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलक नेत्यांनी प्रशासनाला दिला आहे.
