खरीप हंगामातील १२३ कोटींचे विमा वाटप पूर्ण; उर्वरित रक्कम वितरण प्रक्रिया सुरू
परभणी | प्रतिनिधी :
प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) अंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, जिल्ह्यातील तब्बल ५ लाख ७३ हजार ३०२ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. या अंतर्गत ३ लाख ८४ हजार ७२५.१५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात सोयाबीन पिकासाठी पीक कापणी प्रयोगांच्या आधारे एकूण १२४ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली होती. यापैकी १९ जून २०२६ पर्यंत १२३ कोटी रुपयांचे वितरण पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित रक्कम वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच तूर पिकासाठी २२.१३ कोटी रुपयांची विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून या निधीच्या वितरणाची कार्यवाहीही सध्या सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
सोयाबीन पिकाच्या उर्वरित विमा दाव्याबाबत जिल्हा प्रशासनाने आयुक्त कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. पीक कापणी प्रयोगांबाबत विमा कंपनीने घेतलेल्या आक्षेपांवर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे अपील करण्यात आले असून त्यावरील निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान, कापूस पिकाच्या पीक कापणी प्रयोगांबाबत आयुक्त कृषी कार्यालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. आवश्यक मंजुरी आणि मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रयोगांना पीएमएफबीवाय पोर्टलवर मान्यता देण्यात येणार असून त्यानंतर विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना विमा रकमेचे वाटप केले जाणार आहे.
याशिवाय रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ३२० शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले असून, १ लाख ४१ हजार ५०१.४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला आहे. या हंगामातील विमा रकमेच्या वितरणाची प्रक्रिया सध्या विमा कंपनी स्तरावर प्रलंबित आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर संकटांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्त्वाची भूमिका बजावत असून जिल्ह्यातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
