मारेगाव प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाई मोहिमेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत मोठ्या व्यापाऱ्यांना वगळून केवळ लहान टपरी व्यावसायिकांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तालुक्यात अनेक मोठे व्यापारी असतानाही किरकोळ विक्रेत्यांवरच कठोर कारवाई होत असल्यामुळे “मोठे मासे मोकळे आणि लहान मासे जाळ्यात” अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही अधिकाऱ्यांनी मोठ्या व्यावसायिकांशी हातमिळवणी केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
करणवाडी येथील नीत नावाच्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करून त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला तसेच न्यायालयामार्फत रिमांडही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तालुक्यातील छोट्या व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, कारवाईमध्ये दुजाभाव होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने मोठ्या व्यापाऱ्यांवरही समान पद्धतीने कारवाई करावी, अन्यथा जनतेचा संताप अधिक वाढू शकतो, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
