मारेगाव प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यातील चिंचोली बोटोनी सर्कल अंतर्गत येणाऱ्या जळका फाट्याजवळ उभारण्यात आलेला प्रवासी निवारा सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत उभा असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या निवाऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. निवाऱ्यालगत जंगल परिसर असल्यामुळे येथे माकडांचा मोठा वावर असून हा प्रवासी निवारा अक्षरशः माकडांच्या ताब्यात गेला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवाशांना येथे थांबणेही धोकादायक बनले आहे.
जळका, आवडगाव, पानवीर तसेच परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
विशेषतः शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या समस्येचा मोठा फटका बसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
