चांदवड | प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोमवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग येणार आहे. शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अनेक लहान मुलांनीही पावसाचा मनमुराद आनंद लुटला.
गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र पावसाच्या आगमनामुळे तापमानात घट झाली असून वातावरण प्रसन्न झाले आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
