जळगाव प्रतिनिधी :
जळगाव शहराला भविष्यातील पाणीटंचाईपासून सुरक्षित ठेवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग (पावसाचे पाणी संधारण) धोरणाची प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन, भूजल पातळीत वाढ आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर त्यांनी भर दिला.
सध्या जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात सुमारे ६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून हा साठा अंदाजे सात महिन्यांसाठी पुरेल, अशी माहिती देण्यात आली. शहरातील पूरक जलस्रोत म्हणून ४३ विहिरी आणि ६० बोअरवेल कार्यरत आहेत. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आतापासूनच दीर्घकालीन उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले.
त्यांनी शहरातील सर्व मोठे बांधकाम प्रकल्प, व्यापारी संकुले, गृहसंकुले, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच औद्योगिक आस्थापनांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था अनिवार्यपणे कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नाल्यांद्वारे वाहून जात असल्याने ते जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
शहरातील एकूण पाणी वापरामध्ये किमान २० टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी जलवाहिन्यांमधील गळती रोखणे, अनधिकृत पाणी वापरावर कारवाई, पाण्याचा पुनर्वापर आणि जनजागृतीवर विशेष भर दिला जाणार आहे.
याशिवाय पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्या नवीन कार वॉश व्यवसायांना परवानगी देताना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशा व्यावसायिकांनी पुनर्वापरित किंवा प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करावा, असेही प्रशासनाला निर्देशित करण्यात आले आहे.
शहरातील जलवाहिन्यांचे सर्वेक्षण करून गळतीग्रस्त भागांची तातडीने दुरुस्ती, अनधिकृत पाणी जोडण्या, बायपास लाईन, मीटरमध्ये छेडछाड तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
घरगुती व व्यावसायिक स्तरावर आरओ (RO) यंत्रातून बाहेर पडणाऱ्या वेस्ट वॉटरचा साफसफाई, फ्लशिंग, बागकाम आदी दुय्यम कामांसाठी पुनर्वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, “माझे पाणी – माझा अभिमान” या अभियानांतर्गत शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
यावेळी उपमहापौर मनोज सुरेश चौधरी म्हणाले, “वाघूर धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आजपासूनच प्रत्येक जळगावकराने पाणी बचतीची सवय लावणे आवश्यक आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर आणि पाण्याचा अपव्यय रोखणे ही काळाची गरज असून प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून जळगाव शहर जलसुरक्षित बनवूया.”
