श्रीगोंदा : प्रतिनिधी
कुकडी प्रकल्पाच्या हक्काच्या पाण्यासाठी तसेच रखडलेल्या दुरुस्ती कामांसाठी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण आंदोलन छेडले. मारुती भापकर व कृष्ण यादव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या उपोषणात अनेक शेतकरी सहभागी झाले होते.
या आंदोलनात सुभाष पणदरकर, अनंता कदम, शिवाजी भोर, रंगनाथ कदम, सुभाष गलबते, गणपत नलगे, अमोल पणदरकर, शिवाजी भापकर, युवराज भापकर, सुदाम रामसिंग, पिंटू नलगे आदी शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या होत्या :
- हंगा डी.ओ.चे पक्के लोखंडी गेट बसवण्यात यावे.
- डी.वाय. ८ ची मायनर चारी क्रमांक १ शेतकऱ्यांनी बुजवली असून ती पूर्ववत सुरू करून द्यावी.
- मायनर चारी क्रमांक ४५ अनेक ठिकाणी बुजल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, ती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
दिवसभर सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे तसेच उपअभियंता बबनराव वाळके यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून मागणी क्रमांक २ आणि ३ मान्य करण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन दिले.
प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याने आणि लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मारुती भापकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले.
