उमरगा प्रतिनिधी
दि. २३ जून रोजी येणेगुर ग्रामपंचायत कार्यालय येथे गावातील एकल महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी विशेष निवारण कार्यक्रम व बैठकीचे आयोजन करण्यात आले.
महिला व बालविकास मंत्रालयाच्या शासन परिपत्रकानुसार तसेच मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात ग्रामपंचायत प्रशासन, अंगणवाडी सेविका आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि अविवाहित महिलांच्या समस्या गाव आणि प्रभाग स्तरावर सोडवण्यावर भर देण्यात आला.
बैठकीत प्रामुख्याने श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच अन्नसुरक्षा योजनेचा लाभ एकल महिलांना मिळवून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
अनेक महिलांकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याने त्या योजनांपासून वंचित राहत असल्याची बाब यावेळी समोर आली. यावर तोडगा म्हणून ग्रामपंचायत अधिकारी एल. जी. कांबळे यांनी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करून उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, रेशन कार्ड आदी कागदपत्रे तातडीने पूर्ण करून देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
यावेळी गावच्या सरपंच रेखाताई गुंजोटे यांनी एकल महिलांचा सन्मान राखण्यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन त्यांना शासकीय योजनांमध्ये प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. तसेच गावातील कार्यकर्त्यांना एकल महिलांची यादी आठ दिवसांच्या आत ग्रामपंचायतीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच बाबासाहेब गायकवाड, विश्वनाथ गुंजोटे, सिद्धेश्वर हिप्परगे, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष, कर्मचारी सचिन दूधभाते, खुर्शीद येळीकर, सोनू घंटे, कुमार येडगे तसेच गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना शासकीय योजनांची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात आली. महिला व बालविकास आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अशा प्रकारच्या निवारण बैठका महानगरपालिका व नगरपालिका स्तरावरही टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
