चांदवड ता. प्रतिनिधी :
साळसाने गावातील दोन युवकांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावातील पवन शांताराम कोतवाल आणि समाधान नागेश्वर कोतवाल या दोघांची भारतीय सैन्यात निवड झाली असून त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी गावात दोन्ही युवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला नितीन गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी दोन्ही युवकांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
गावातील युवकांनी देशसेवेचे स्वप्न पूर्ण केल्याने साळसाने गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
