कडेगाव : प्रतिनिधी
सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्य जपणाऱ्या कडेगाव शहरात मोहरम निमित्त गगनचुंबी ताबूतांच्या भेटींचा दिमाखदार आणि पारंपरिक सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यास उपस्थित राहिले होते. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील भाविकांची विशेष गर्दी पाहायला मिळाली.
कडेगाव येथे गेल्या १७५ वर्षांपासून मोहरम उत्सवातून सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली जात आहे. यावर्षीही ही परंपरा उत्साहात अनुभवायला मिळाली.
शुक्रवार दि. २६ रोजी सकाळी कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड आदी गावांतील मानकऱ्यांना वाजत-गाजत आणण्यात आले. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून सकाळी ११ वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला आणि भेटी सोहळ्यास सुरुवात झाली.
सातभाई ताबूत विजबोर्ड परिसरात आल्यानंतर देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत त्यात सहभागी झाले. त्यानंतर बागवान, अत्तार, शेटे तसेच अन्य उंच ताबूत पारंपरिक मानाप्रमाणे उचलण्यात आले. पुढे पाटील यांचा भव्य आणि आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि खऱ्या अर्थाने ताबूतांच्या गळाभेटींचा सोहळा सुरू झाला.
यावेळी “या हुसेन”, “हक हुसेन”, “इमाम हुसेन झिंदाबाद”, “मौला अली झिंदाबाद”, “एक नारा हैदरी, या अली या अली” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सातभाई, पाटील, बागवान, अत्तार, हकीम आणि देशपांडे या मानाच्या ताबूतांच्या प्राथमिक भेटी दुपारी १२ वाजता संपन्न झाल्या.
या भेटींना “राम-भरताची भेट” असे संबोधले जाते. भाविकांनी आकाशात फेटे व टोप्या उंचावत जल्लोषात या भेटींचे स्वागत केले. पावसाच्या रिपरिपीत आणि जोरदार वाऱ्यात झालेल्या गगनचुंबी ताबूतांच्या भेटींनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
यानंतर सर्व ताबूत वाजत-गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेशबाबा देशमुख चौक (मोहरम मैदान) येथे दाखल झाले. मार्गात तांबोळी तसेच अन्य ताबूतही सहभागी झाले. त्यानंतर माईनकर, इनामदार आणि सुतार यांचे उंच व आकर्षक ताबूत उचलण्यात आले.
मोहरम मैदानावर सर्व ताबूत एकत्र आल्यानंतर मेलवाल्यांकडून “महान भारत देश आमुचा घुमवू जयजयकार”, “प्यारा प्यारा हमारा देश प्यारा”, “हिंदू-मुस्लिम साथ रहेंगे, एकीसे सागर पार करेंगे” अशी राष्ट्रीय एकात्मतेची गीते सादर करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर हिंदू मानकऱ्यांच्या हस्ते मसूद माता ताबूत पंजे आणि बारा इमाम पंजे आणण्यात आले. पारंपरिक मानाप्रमाणे मुख्य भेटींचा सोहळा पार पडला. दुपारी तीन वाजता भेटी सोहळ्याची सांगता झाली आणि सर्व ताबूत आपापल्या ठिकाणी परतले.
या सोहळ्यास माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, डॉ. विक्रम कदम, पंचायत समिती सभापती डॉ. जितेश कदम, विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे, नगरसेवक, ताबूत मालक, मानकरी आणि हजारो भाविक उपस्थित होते.
चौकट
मोहरम मार्ग काँक्रिटीकरणामुळे ताबूत भेटी सुकर
मोहरम ताबूत भेटीच्या वेळी खांदेकरी आणि तोरणीवाल्यांना अरुंद रस्त्यांमुळे मोठी कसरत करावी लागत होती. मात्र नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे संपूर्ण मोहरम मार्गावर अंडरग्राउंड गटार व काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्याने यावर्षी ताबूतांच्या भेटी अधिक सुकर झाल्या.
